मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला होता. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री व्हायला आवडणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या सर्व प्रकरणात आता भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रकणावर टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधल्या पक्षांनी ग्रामपंचायतीमध्ये जसं लोक सरपंचपद वाटून घेतात, तसंच मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं, असा चिमटा महाविकास आघाडी सरकारला काढला आहे. तसेच येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची नाना पटोले यांच्यासह अजित पवारांना संधी आहे. त्यामुळे त्यांनी येत्या तीन वर्षातच मुख्यमंत्री व्हावे, त्यासाठी शुभेच्छा देखील रावसाहेब दानवे यांनी दिल्या आहेत.
रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टिकेनुसार महाविकास आघाडीकडे फक्त तीनच वर्ष सत्ता उपभोगण्याची वेळ आहे, असं या वक्तव्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात आता नाना पटोले यांनी अजित पवार नेमकं काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला
अजित पवार म्हणाले की, “नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाल महत्वाकांक्षा असते. पण शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून जे व्यक्ती आहेत. ते निर्णय घेत असतात. आता कोणत्या पक्षाशी आघाडी करायची की स्वबळावर लढायचं हा अधिकारा काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे आम्ही यावर मत व्यक्त करणं योग्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.