नाशिक: महाराष्ट्राच्या भूमीवर पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबावर महाराष्ट्राचा आणि फक्त महाराष्ट्र वासियांचाच हक्क आहे. त्यामुळे जरी आपण हे पाणी वापरत नाही म्हणून गुजरात राज्याला ह्या पाण्याचा कायमस्वरूपी हक्क जलकराराद्वारे देण्यात येऊ नये. आपल्याला कितीही खर्च आला आणि कितीही आर्थिक तिजोरीवर ताण पडला तरी देखील चालेल मात्र आपण हे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळवण्याचा ध्यास घेऊन काम करण्याची आता गरज आहे असे प्रतिपादन नाशिक जिल्हाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेतर्फे १४ मे ते १७ मे अशी चार दिवसीय वर्चुअल रॅली झाली आहे. त्यामध्ये तिसऱ्या दिवशी दिनांक १६ मे रोजी प्रमुख वक्ते म्हणून भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, राजेंद्र जाधव, सुरेश पाटील, भिला पाटील यांनी नार-पार च्या पाण्याविषयी भूमिका मांडली आहे. यावेळी भुजबळ म्हणाले, मांजरपाडा -१ या प्रकल्पाचे स्वप्न मी दहा वर्षापूर्वीच बघितले होत. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा वर्ष अथक प्रयत्न आणि परिश्रम घ्यावे लागले. यावर्षी पावसाळ्यात दिंडोरी- चांदवड- येवला व त्यापुढील तालुक्यांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. त्यामुळे नार-पार प्रकल्पाचे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य आहे हे मांजरपाडा प्रकल्पाद्वारे सिद्ध झालेले आहे.
यावेळी जलतज्ञ् राजेंद्र जाधव यांनी म्हटले आहे की, नर्मदा तापी खोऱ्यात महाराष्ट्रावर गुजरातने अन्याय करून पाणी कमी दिले आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती ही काहीशा प्रमाणात विचित्र आहे. सातपुडापर्वत रांगांच्या उत्तर बाजूने नर्मदा नदी वाहत असल्याने त्या पाण्याचा आपण वापर करू शकत नाही. तसेच तापी नदी ही महाराष्ट्राच्या खालच्या लेव्हलला वाहत असते. महाराष्ट्राला तापी नदीच्या पाण्याचा वापर करायचे झाल्यास ते उकाई धरणातून लिफ्ट करून गिरणा-पांझरा-बोरी-बुराई या नद्यांमध्ये पहिले टाकावे लागेल. त्यामुळे उकाई धरणातून ५० टीएमसी पाणी महाराष्ट्रासाठी लिफ्ट करण्याची मागणी केंद्र सरकार कडे करण्यात यावी असे राजेंद्र जाधव यांनी म्हटले आहे.
काय आहे नार-पार-दमणगंगा नदीजोड प्रकल्प
नार- पार दमणगंगा या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगना तालुक्यातील पश्चिम वाहिनी नदया पूर्व वाहिनी करून म्हणजेच नदीजोड करून त्यातून वाया जाणारे जवळपास 150 टीएमसी गुजरातला वाहून जाणारे पाणी रोखण्याची योजना आहे.
नार-पार योजना उत्तर महाराष्ट्राच्या सार्वगिण विकासासाठी परिवर्तन करणारी बहूचर्चित योजना आहे. सह्याद्रीच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूमच्या पाऊस अडवला जातो. आणि धो धो कोसळतो. आणि नार-पार, दमणगंगा नदीचे द्वारे अरबी समुद्रात वाहनू जातो. प्रत्येक वर्षी पडणार्या पावसाची आकडेवारी ३ ते ३.५० हजार मिलीमीटर आहे. थोडक्यात उत्तर महाराष्ट्रातील तालुक्यांपेक्षा पाच पट्टीने अधिक जास्त पाऊस या परिसरात पडतो. हे प्रत्येक वर्षाच्या शासकीय आकडेवारी वरुन दिसून येते. राज्यातील प्रकल्पात मे च्या पहिल्या आठवड्यात ३० ते ३५ टक्के पाणी साठा असतांना नाशिक विभागात हे प्रमाण फक्त १५ टक्केचे आसपास असते. यावरुन उत्तर महाराष्ट्रातील पाणी टंचाईचे रुप किती चिंताजनक आहे हे दिसून येते. म्हणून महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्याचे म्हणजेच अरबी समुद्रात वाहून वाया जाणारे नार-पार, दमणगंगा नद्याचे पाणी पुर्वेकडील पाणी टंचाई असलेल्या गिरणा खोर्याकडे वळविणे आवश्यकच नसुन काळजी गरज आहे. नार-पार दमणगंगा नद्याची एकुण उपलब्ध जलसंपत्ती १६० टी.एम.सी. इतकी आहे व संपूर्ण १६० टी.एम.सी. जलसंपत्ती दुर्लक्षित आहे. ही दुर्लक्षीत जलसंपत्ती प्रारंभ बोगद्याद्वारे तर काही ठिकाणी धरणे बांधून किंवा लिफ्टद्वारे हे वायाजाणारे पाणी हवे तसे वळविणे व वापरात आणणे हाच उत्तर महाराष्ट्रातील पाणी टंचाईवर रामबाण उपाय आहे, असे पाणी तज्ञाचे मत आहे. पावसाची अनिश्चितता प्रमाणशीर नसलेले पर्जन्य, प्रचंड पाणी टंचाई व वाढती लोकसंख्या इ. बाबींचा प्राधान्याने आमदार, खासदार, मंत्रींसह सर्वच लोक प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्य करणार्या संस्था, राज्य सरकार व केंद्र सरकार यांना आज नाहीतर उद्या विचार करावाच लागणार आहे. कारण अशा महत्वकांक्षी योजना हाती घेतल्याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील पाणी टंचाईचा पेच सुटणार नाही हे कटुसत्य आहे.