धुळे: धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष सर्व महाराष्ट्राला श्रुत आहे. भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर अनिल गोटे कायमच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. देशातील सर्वात मोठे ‘ऐशोआरामी शहेनशहा ‘ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत ‘फकीर फकीर’ म्हणत देशातील सर्वश्रेष्ठ ऐशो आणि आराम भोगणारे पहिले पंतप्रधान म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी यासंदर्भातील पत्रक सोशल मीडियावरती व्हायरल केले आहे. या परिपत्रकामधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दीड वर्षांमध्ये तब्ब्ल ३३ हजार कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप गोटे यांनी परिपत्रकातून केला आहे. दिल्लीतील नवे पंतप्रधान निवास बांधण्याची योजना आहे. त्यावरून आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. कोरोना महामारीच्या संकट काळात एवढा खर्च करणे उचित नाही.
एवढ्या पैशांमध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्याचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारता आला असता. त्याचप्रमाणे व्हेंटीलेटर्स ने अद्यावत असणारे हॉस्पिटल,जास्त बेड्स ची संख्या असणारे हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात या पैशातून उपलब्ध करता आले असते असे गोटे यांनी परिपत्रकात म्हटले आहे. कोरोना महामारीच्या या संकट काळात राष्ट्राची सुरक्षा महत्वाची की पंतप्रधानांचा ऐशोआरामाचा खर्च महत्वाचा ? या मध्ये कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचे हे आता मोदी यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे असे देखील गोटे यांनी म्हटले आहे.