गोदावरी खोऱ्यातील पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचा प्रस्ताव मागील काही काळात मांडला गेला होता. मात्र, महाराष्ट्रातील मोठा भाग पाण्यापासून वंचित असल्याने नाशिक जिह्यातील हे पाणी राज्याबाहेर जाऊ न देता येथील जमिनीलाच त्याचा फायदा देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी आयोजित कळमुस्ते प्रवाही, वैतरणा-मुकणे वळण योजना आणि उर्ध्व कडवा प्रकल्पांची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कळमुस्ते प्रवाही वळण योजना ही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव येथील दमणगंगा खोऱ्यातील वालनदीच्या नाल्यावर प्रस्तावित आहे. गोदावरी आणि तापी खोर्यातील उपलब्ध पाण्याचा पूर्ण वापर झाला असल्याने शासनाने औरंगा, अंबिका, नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा खोऱयातील नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी आणि तापी खोऱयात वळवण्यासाठी समन्वय समितीमार्फत अभ्यास केला. त्यानुसार 19 प्रवाही वळण योजनेद्वारे 2 हजार 321 दशलक्ष घनफूट पाणी नाशिक जिह्यातील गोदावरी खोऱयात उपलब्ध होईल.