मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तीन पक्षांचे सरकार स्थापन करून राज्याच्या राजकारणात त्यांनी भूकंप आणला होता. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासह काही नेत्यांनी राष्ट्रपतींची देखील भेट घेतली होती. यातच आता यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं शरद पवारांच्या हाती जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
याविषयी बोलताना आता ‘शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केलेली नाही. यूपीएचं अध्यक्षपद किंवा विरोधी पक्षांचा नेता कोण होणार, हा सध्या विषय नाही, त्याबाबत सर्व जण मिळून निर्णय घेतील’, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी याविषयी भाष्य केले.
नवाब मलिक म्हणाले की, विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचे आहे.
विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे, असेही मलिक म्हणाले. विधान परिषदेच्या निकालांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्राने स्वीकृती दिली आहे. त्यामुळे देशातही हा प्रयोग झाला, तर स्वीकारलं जाईल. जनतेला चांगला पर्याय दिल्यास सत्तांतर निश्चित आहे, असे ते म्हणाले.