मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, तसेच कार्यालये मिळून १० ठिकाणी सीबीआयने आज सकाळी धाडी टाकून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली असून, अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील माध्यमांसमोर आपले मत मांडले असून, ज्यापध्दतीने आज सीबीआयने धाडसत्र सुरू केले आहे त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयासमोर सीबीआयने प्राथमिक अहवाल ठेवला का? कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय किंवा आदेश दिला आहे का? असे संतप्त सवाल नवाब मलिक यांनी सीबीआयला विचारले आहेत.
सीबीआयला संशय असेल, तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात, शिवाय गुन्हा दाखल करु शकतात, परंतु पहिल्या दिवसापासून यामध्ये ज्याप्रकारे हे प्रकरण हाताळण्यात आले आहे, यावरुन हे राजकारणच सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच, हा राष्ट्रवादीला आणि मंत्र्यांना सत्तेचा दुरुपयोग करून बदनाम करण्याचा खेळ सुरु आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जे खरे आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे, ते जनतेसमोर उघड होईल, असा आशावाद देखील मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.