मुंबई: आर्यन खान प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध एनसीबी, केंद्र सरकार असा संघर्ष जणू पाहायला मिळत आहे. आर्यन खान याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा पाय खोलात असल्याचे चित्र आता समोर आले आहे.
समीर वानखेडेंना या केसमधून आणि आणखी पाच मोठ्या प्रकरणांच्या चौकशीतून हटवण्यात आले आहे. यावरून केंद्र सरकारने वानखेडेंवर ठेवलेला अदृश्य हात अलगदपणे काढून घेतला आहे अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. यातच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे दिवसेंदिवस नवीन नवीन पुरावे सादर करत आहेत आणि वानखेडेंना लक्ष्य करत आहेत.
शुक्रवारी आर्यन खान केसचा तपास एनसीबीच्या एसटीकडे देण्यात आला आहे. यानंतर समीर वानखेडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की मला या तपासातून हटवण्यात आलेलं नाही तर मीच या प्रकरणाचा तपस केंद्रीय संस्थेमार्फत होण्यात यावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरून आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी वानखेडेंवर टीका केली आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटलं आहे की समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणासह एकूण ५ प्रकरणांच्या तपासातून हटवलं आहे. अशीच एकूण २६ प्रकरणं आहेत ज्यांचा चांगला तपास होणे गरजेचे आहे. ही एक सुरुवात आहे आणि व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजूनही बरंच काही करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही ते करू असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
शनिवारी पुन्हा एकदा सकाळी सकाळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं आहे आणि त्यात त्यांनी समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी आपणच केली आहे असं म्हटलं आहे. आर्यन खानचे अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी करण्यात यावी यासाठी मी आग्रही होतो असे देखील मलिक म्हणाले आहेत.
आता या प्रकरणी केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. या दोन्ही पैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा खरा चेहरा समोर आणतं आहे ते पाहुयात असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.