नाशिक : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकजूटीचा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. राज्यातील विधानपरिषद निवडणुकीतील पराभवातून भाजपने धडा घ्यायला हवा. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्ला चढवला.
लासलगाव येथे बोलताना भुजबळ म्हणाले की, jeज्यातील विधानपरिषद निवडणुकीतील पराभवातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करायला हवे. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही.
काही दिवसांपूर्वी इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांचाच डाव उलटला, असे म्हणत भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला.
पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर ते निवडून आले. मात्र, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, याची देखील त्यांनी आठवण करून दिली. पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी महाविकासआघाडीच्या बाजूने कौल दिला. या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा, असे भुजबळ म्हणाले.