उस्मानाबाद जिल्ह्यातील नेत्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारं बंद असल्याचं खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीदरम्यान पवारांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक असलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासंदर्भात बोलताना दिल्या घरी सुखी राहा, अशा शब्दात पवारांनी पाटील कुटुंबाला आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याच स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर तुळजापूर येथे अधिकार्यांकडून नुकसानीचा आढावा घेतला. दुसर्या दिवशी सोमवारी तुळजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील अनेक नेते जे राष्ट्रवादीसोडून गेले, ते परत राष्ट्रवादीत येऊ इच्छित असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता पवार यांनी काही भागातील नेत्यांबाबत पक्षानं निर्णय घेतला आहेत. त्यात उस्मानाबादच्या नेत्यांचं नाव न घेता त्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचं पवारांनी जाहीर केलं.
तसेच यावेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत सूचक विधान केले. ” मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. खडसेंनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. याबाबत शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे. भाजपाने सर्वाधिक प्रभावी असलेल्या खडसेंची पाहिजे तशी नोंद घेतली नाही. मात्र राजकीय निर्णय काय घ्यावा? हा त्यांचा प्रश्न आहे,” असे पवार म्हणाले.