ठाणे : प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असतांना आदल्या दिवशी मीरा रोड भागात मोठ्या प्रमाणात राडा झाल्याची माहिती समोर आलीय. यावेळी श्रीरामाचे झेंडे असलेल्या काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. याच अनुषंगाने दोषींवर कठोर कारवाई येईल. असा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर भाजपचे आमदार नितेश राणे आज मीरा रोडवर जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी मीरा रोडच्या नया नगर भागात दोन गटांनी रॅलीचं आयोजन केलं होतं. परंतु या दोन्ही गटामध्ये किरकोळ वाद झाल्याने दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काही लोकांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यातच आज मंगळवारी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्थानिक पोलिसांबरोबर राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्यांचा यात समावेश आहे. तर नया नगरला जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि संयम बाळगावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेच्या निमित्ताने नितेश राणे यांनी चिथावणी देणारे ट्विट केले होते. मंगळवारी ते मीरा रोडमध्ये येत आहेत. वातावरण चिघळू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात
मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
मुख्यमंत्री, गृहमंत्री कारवाई करणार का ? – अंबादास दानवे
दरम्यान, मीरा भागात झालेल्या या राड्यावरून अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. याला दिव्याखालील अंधार म्हणतात. काल रात्री मुख्यमंत्री महोदयांच्या ठाण्यातील मीरा रोड भागात रामभक्तांवर हल्ला करण्यात आल्याची वर्ता व्हायरल झालीय. यात गाड्यांचे नुकसान करण्यात आले आणि यात काल महिलेलाही इजा झाल्याचे दिसते आहे. देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना अशी अप्रिय घटना घडवण्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री कारवाई करणार का ? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. असे भर रस्त्यावर होणारे हल्ले कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे ठरतात.अशी टिका देखील अंबादास दानवे यांनी केलीय.
उद्या मीरा रोड..
भेटू मग..
जय श्री राम 🚩
— nitesh rane (@NiteshNRane) January 22, 2024