मुंबई : विविध घोषणांसह घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं. पण राज्यातील वाढीव विज बिलांवरुन आता शिवसेनेने दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेने वचननाम्यात विविध घटकांसाठी जी आश्वासनं दिली, त्यात विज दर कमी करण्याचंही आश्वासन होतं. 300 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज 30 टक्क्यांनी कमी करणे, शासनाच्या पडीक जमिनीवर सौर ऊर्जानिर्मिती, शाळा, प्रार्थनास्थळे, सरकारी रुग्णालये यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देणे अशी आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता दर लांबची गोष्ट आहे. पण ग्राहकांना सध्या वाढीव विज बिलांचा शॉक मात्र मिळालाय.
ग्राहकांना वाढीव विज बिलात कोणतीही सवलत मिळणार नाही, असं सांगत ऊर्जा मंत्र्यांनी यू टर्न घेतला. सत्तेत असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वाढीव विज बिलाबाबत अनेक आश्वासनं दिली. एवढंच काय, पण विज बिल कमी करणार हे आश्वासन शिवसेनेने निवडणूक लढण्याच्या अगोदरच दिलं होतं याचाही विसर पडला का हा प्रश्न आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तर दूरची गोष्ट आहे.