नागपूर: “ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजप नेते ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत. सत्ता दिल्यास महिन्यात आरक्षण आणतो, अन्यथा राजकीय संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. परंतु त्यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली असून जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा स्थायीभाव आहे. २०१४ च्या निवडणुकीआधीही त्यांनी धनगर समजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पण पाच वर्षात त्यांना आरक्षण दिले नाही, धनगर समजाची त्यांनी घोर फसवणूक केली. मराठा समाजाचीही दिशाभूल केली आणि त्यांचे आरक्षण रद्द झाले आणि आता ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही तेच झाले आहे. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षण संपुष्टात आणण्याची ही खेळी आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी वारंवार आरक्षणाचा मुद्दा चर्चेत ठेवून आरक्षणविरोधी वातावरण निर्मिती केली. आरएसएसची विचारसणीच आरक्षणविरोधी आहे. त्यांना देशातील आरक्षण संपुष्टात आणायचे आहे.”
सत्तेसाठी काहीही बोलायचं-बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निशाणा साधला असून, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं, तुम्ही फार गांभीर्याने घेतलंत. ते हे देखील म्हणाले होते, “स्वतंत्र विदर्भाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, त्यानंतर आता, हे ओबीसी आरक्षण दिलं नाही, तर संन्यास घेईन, असं म्हणत आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, बोललेल्यापैकी त्यांनी काही केलेलं नाहीये”, असा खोचक टोला त्यांनी लगावला होता.
तसेच, “सत्तेसाठी काहीही बोलायचं आणि सत्ता अलीकी मात्र काहीही करायचं नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा पायंडा आहे. सामान्य नागरिकांना फसवणं आणि सत्ता उपभोगणं हाच उद्देश ठेवून, त्यांच्याकडून अशी वक्तव्य केली जातात. त्यामुळे, त्यांनी केलेल्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असा शब्दांत त्यांनी फडणवीसांच्या गर्जनेवर मत व्यक्त केलं आहे.