मुंबई : भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. एका वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मनसेच्या पक्ष बांधणीसाठी तितकेच चांगले नेते पक्षात हवे असतात, पण आजवर अनेक नेते मनसेला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले याबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं होतं. आता, मनसेनं यासंदर्भातील पुरावाच दिला आहे.
विद्यमान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं, याची माहिती स्वत: राज ठाकरेंनीच दिली. त्यावर भातखळकर यांनी स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांना टोला लगावला. “राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले, परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. २००९ च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय,” असं म्हणत भातखळकर यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
अतुल भातळकर यांनी ते विधान खोट असल्याचे सांगितल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा दाखला देण्यात आला आहे. भाजपाचे काही नेते त्यांच्याकडे गेले की ते नितीन गडकरींना फोन करुन सांगायचे. राज ठाकरे म्हणतात ते खरंय… असं या मुलाखतीतील व्हिडिओत गडकरींनी म्हटल आहे. मनसेनं या व्हिडिओचा दाखला देत अतुल भातखळकर तोंडावर आपटल्याचं म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, “गौप्यस्फोट करण्याकरता माझा असा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. मी भाजपमध्ये होतो, आहे आणि आयुष्यभर राहीन. माझ्या दृष्टीनं पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळीही सांगितलं होतं आणि त्याचा पुनरूच्चार मी आताही करत आहे. असं भातळकर यांनी सांगितले.