मुंबई: भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या टीकेमुळे कायम चर्चेत असतात. काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली म्हणून पडळकरांनी खालच्या भाषेत ट्वीट करून विखारी टीका केली होती. पण ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं, आपल्या भाषेवरून आपल्या संस्काराची ओळख होते’ अशा शब्दांत थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी पडळकरांच्या टीकेला उत्तर देताना चांगले सुनावले आहे.
माझ्या हातात सूत्र द्या, ओबीसींची गेलेलं आरक्षण मिळवून देतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो, असं वक्तव्य फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना थोरात यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या वाद्याची आठवण करुन देत वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नव्हतात, त्याचं काय झालं? असा सवाल केला होता. हाच सवाल पडळकरांच्या जिव्हारी लागला . थोरात यांच्या टीकेनंतर लागलीच पडळकर यांनी ट्विट करुन थोरातांवर हल्ला चढवला. ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका त्यांनी केली होती
पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..! https://t.co/KhFuxuQOSe
— Sharayu Deshmukh (@SharayuDeshm) June 29, 2021
पडळकरांच्या या टीकेल्या थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीट करून जशास तसे उत्तर दिले. ‘पात्रता पेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ असं म्हणत शरयू देशमुख यांनी पडळकरांना चांगलेच संस्काराचे धडे दिले.
कोण आहेत शरयू देशमुख?
शरयू देशमुख या बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या त्या संचालक देखील आहे. सातत्याने त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा होत असते. मात्र त्यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केलेला नाही.