मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.
राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरजदेखील वाढत असून केंद्राने सध्याचा पुरवठा आणखी 200 मेट्रिक टनाने वाढवावा अशी विनंती राज्य शासनाने केंद्र सरकारला केली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनची गरज वाढत आहे. हे लक्षात घेऊन राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरु करण्यात व्यक्तिगत लक्ष घालावे असे पत्र मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना लिहले आहे.