पंढरपूर – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागला असून या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 7 हजार 500 मतांनी बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हार मानवी लागली.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणीच्या सातव्या फेरी अखेरीस भाजपचे समाधान आवताडे यांनी आघाडीची बाजी मारण्यास सुरवात केली.
दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 3 लाख 50 हजार 889 मतदार असून एकूण 524 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही निवडणूक राजकीय प्रचारसभा आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे देखील विशेष चर्चेत राहिली होती.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके, तर भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत असली तरीही, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात होते.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत ३८ व्या फेरीपर्यंत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांची आघाडी कायम राहिली होती तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवरच होते. त्यामुळे मतमोजणी कक्षात आलेले भालके यांचे समर्थक मतमोजणी केंद्रातून बाहेर पडत असल्याचे चित्र पहायला मिळाले होते.