मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी खडसेंच्या पक्ष बदलावर भाष्य केलं आहे.
मागील काही दिवसांपासून खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही पंकजा मुंडे म्हणतात, खडसे पक्ष सोडतील, असं मला वाटतं नाही. ही फक्त चर्चा आहे. जसा एखादा नेता पक्षात आला तर फायदा होतो, तसाच सोडून गेल्यावर नुकसान होतं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
तसेच जोरदार पावसानं झालेल्या नुकसानीवरही त्यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बांधावर जावं, मी जेव्हा बोलते तेव्हा संपूर्ण सरकारविषयी बोलते, जलदगतीने निर्णय घ्यावा. राज्यभराच्या बांधावर जाऊ शकत नाही हे मान्य, पण बांधापेक्षा शेतकऱ्यांपर्यंत निर्णय पोहोचणे महत्त्वाचं असल्याचंही पंकजा मुंडेंनी अधोरेखित केलं आहे.
आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केली आहे. जलयुक्त शिवार योजना ही अत्यंत चांगली आणि लोकहिताची आहे. त्यांनी चौकशी लावावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. जलयुक्त शिवारची कामं ही लोकांनी केलेली योजना आहे. बीड जिल्ह्यामध्ये लोकांना फायदा झाला आहे. तसेच पंकजा मुंडेंनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री पत्रप्रपंचावरही भाष्य करणं टाळलं. राज्यपालांवर मी टिप्पणी करणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
दोघेही एकमेकांना आता उत्तर देऊन झाले आहेत. मी आता त्यावर काय भाष्य करणार, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर त्या म्हणतात, मराठा समाजाची घोर निराशा झाली. बाजू मांडण्यास पूर्ण टीम अपयशी ठरली आहे. आरक्षणामुळे समाजांमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत. ओबीसी समाजाचीसुद्धा चिंता वाढली आहे, तो हवालदिल झाला असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
Read Also ;
मंदिराचा मुद्दा घेऊन भाजप राजकारण करत आहे, सुनील तटकरेंचा भाजपवर आरोपhttps://t.co/iAGeIxnJuS @SunilTatkare @iAditiTatkare
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020