मुंबई : राज्य सरकारने राज्याचे पोलीस महालंचालक संजय पांडे यांना, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ज्यामध्ये १ एप्रिल रोजी, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऑल इंडिया सर्विसच्या नियमावलीतील निर्देशांचा भंग केल्याबद्दल तर, २० एप्रिलला राज्याचे सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, परमबीर सिंग यांच्याविरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
दरम्यान, परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचं पत्र पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पाठवलं आहे. परमबीर सिंग यांनी संजय पांडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर लगेचच संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला हे पत्र लिहिले आहे. परमबीर सिंग यांनी, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप करत, मी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेतली, तर ते माझ्या विरोधात सुरु असलेली चौकशी मार्गी लावतील, असा दबाव टाकण्यात आला असल्याचे सांगितले आहे.
तसेच, राज्य सरकारनं परमबीर सिंग यांच्याविरोधात सुरु केलेल्या दोन प्रकरणांतील प्राथमिक चौकशीला देखील परमबीर सिंग यांनी विरोध दर्शवला आहे. याविरोधात त्यांनी पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले असून, यासंदर्भात नुकतीच एक याचिका देखील त्यांनी दाखल केली आहे.
यावेळी, मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची होमगार्डच्या पोलीस महासंचालक पदावर बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळेच आता हा विनाकारण त्रास दिला जात आहे, तसेच एकापाठो पाठ एक गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचं सांगत, अनिल देशमुखांविरोधात लिहिलेलं पत्र मागे घेण्यासाठी, त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेतून केला आहे.