चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी जाण्याची परवानगी असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. गणपतीला चाकरमानी गावी जाणार असल्याने त्यासाठीचे नियोजन केले जात असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले आहे.
चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेणार असून त्यादृष्टीने विषय चर्चिले गेले. या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊन त्यावर पुढील निर्णय होणार आहे, असे परब यांनी स्पष्ट केले. चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणातील गावी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियम व अटी निश्चित केल्या जाणार असून त्यावर मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असेल, असेही परब यांनी नमूद केले.
गणपतीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. त्यासोबतच एसटीच्या ज्यादा गाड्याही सोडल्या जातात. यंदा रेल्वेगाड्यांची शक्यता अगदीच धुसर आहे. याबाबत विचारले असता परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बसेस सोडल्या जातील, असे परब यांनी स्पष्ट केले.