31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर हल्ला बोल केला आहे.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले’, ‘मी मुख्यमंत्री असतो तर कोरोना संपला असं जाहीर केलं असतं, तसेच सरकारने अनलॉक प्रक्रिया केली नाही, तर लोकच अनलॉक करत आहेत. सरकारने लॉकडाऊन केलं, परंतु अनलॉक करण्याची चावी त्यांना सापडत नाही,’ असा घणाघातही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एसटीमध्ये ई-पास लागणार नाही, परंतु खासगी गाडीला ई-पास लागतो, हा शासनाचा दुजाभाव आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारने ई-पास सक्ती रद्द करावी अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान 24 ऑगस्ट रोजी या प्रश्नावर जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे. सध्या पंढरपूरमध्ये 2035 कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे 24 ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास संघर्ष अटळ बनणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.