मुंबई : प्रकरण 2009मधील असताना पोलिसांनी आता नोटीस पाठवण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते काय? असा सवाल करतानाच केवळ सूडबुद्धीतूनच मला नोटीस बजावण्यात आली आहे, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.
प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मला नोटीस पाठवल्याचं आताच कळलं. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. 2009 साली ही तक्रार दाखल करण्यात आली होती. बीव्हीजी आणि क्रिस्टलने मिळून हे काम केलं होतं. आमचं काम समाधानकारक होतं म्हणून पालिकेने आमचं डिपॉझिटही परत केलं आहे. याचाच अर्थ यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. शिवाय हे प्रकरण दहा वर्षांपूर्वीचं आहे. मग त्यावर आत्ताच नोटीस देण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते का? असा सवाल लाड यांनी केला.
हा वाद दोन नेत्यांमधील आहे. 2013 साली सत्यपाल सिंग यांनी ही केस स्कॉश केली होती. मग ही केस परत का उघडण्यात आली, असा सवाल करतानाच आता मी या प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
इतर लोकांनी पत्रकार परिषदेत जशी उत्तरे दिली तसंही मी करणार नाही. मी माझ्या कामात नेहमीच यशस्वी झालेलो आहे. चौकशीच करायची असेल तर महापालिकेत अनेक घोटाळे झाले आहेत. तिथेही तपास करा. भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक कागदपत्रं घेऊन घोटाळे बाहेर काढत आहेत. मग तिथे कारवाई कधी करणार? उद्यापासून मीही पालिका घोटाळ्याच्या फायली द्यायला सुरुवात केली तर?, असा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.