मुंबई : इगोपोटी निर्णय रखडवला, मंदिरं उघडणे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले. या सरकारनं हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र केवळ भाजप आंदोलकांना, पुजाऱ्यांना वारकऱ्यांना सपोर्ट करते, मग अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, इगोपोटी हा निर्णय रखडवला होता, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे.
उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचलं, या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळेल, असंही प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केले आहे. बार आणि रेस्टॉरंट सुरू होतात, मग हा निर्णय का रोखला होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आमचाी मागणी हीच होती. गरीब माणूस पांडुरंग किंवा परमेश्वराचरणी समाधान आणि शांती शोधत असतो. शिवाय जे व्यवसाय यावर अवलंबून असतात, त्यांनाही उपासमार होणार नाही, अशी आमची मागणी होती, असंही प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंदिरं सुरू करण्याच्या सुरू असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी धार्मिकस्थळं उघडण्याची घोषणा करून दिवाळी निमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.