मुंबई – युनायटेड किंगडम मधील कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आणि नाताळ, नववर्षाच्या सेलिब्रेशनला होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यावरुन आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार भांबावलेलं आहे. यांना आलेली लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा होतो!’, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला टोला हाणलाय.
यापूर्वी अनलॉकिंगला सुरुवात केल्यानंतर हॉटेल, मंदिरं, मंडई यांना परवानगी दिली होती. मग आता निर्बंध का लावले जात आहेत? असा प्रश्न दरेकांनी विचारलाय. ब्रिटिश एअरवेजच्या सर्व विमानफेऱ्यांवर आपण बंदी आणली आहे. कोरोना संकटासोबतच राज्यावर आणि सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यात इथला माणूस पिचला गेलाय. त्याला अजून संकटात टाकू नका, असं आवाहन दरेकर यांनी राज्य सरकारला केलंय.
सर्वसामान्य माणसाला नाउमेद करु नका. कोरोनापेक्षा तो उपासमारीने मरेल. छोट्या-मोठ्या व्यावसायीकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. पण दुर्दैवानं ते होताना दिसत नसल्याचं खंतही दरेकरांनी व्यक्त केलीय.