मुंबई : हाथरस बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळत असून युपी पोलिसांच्या वागणुकीवरून योगी सरकारवर टीका होत होती. त्यानंतर योगी सरकारने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या अगोदर आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले होते.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हाथरस प्रकरणासह उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून योगी सरकारला सवाल केले जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास रोखल्यानंही सरकारवर टीका होत आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
“महाराष्ट्रात हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष आंदोलन करतोय, तर शिवसेनेनं आंदोलन केले आहे. सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्याचा अधिकार जरूर आहे. पण महाराष्ट्रातील लेकीसुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यासमोर कधी प्रश्न उपस्थित करणार? गेल्या सहा महिन्यांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय?,” असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सरकार टीका होत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवरून महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये प्रश्न केला आहे. “हाथरस प्रकरण दुर्दैवीच आहे आणि त्याची दखल घेत तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करत प्रकरण सीबीआयकडे दिले, पण इथे गेल्या सहा महिन्यांत ज्या घटना घडल्या त्यावर किती कारवाई झाली? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पाहणार? असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केला.
“हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाला अधिकार आहे. मात्र त्याच बरोबर हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी आहेत. त्या सरकारने गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे,” असं आवाहन उपाध्ये यांनी केलं आहे.
“महाराष्ट्रात करोना उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णांवर बलात्कार, विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत. पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे शासकीय लॅबमधील टेक्निशियनने करोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याची घटना घडली आहे. फेब्रुवारीमध्ये मध्ये ७ वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती/महिलांना जिवंत जाळले गेले. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगाव या ठिकाणी या घटना घडल्या. यातील चौघींना जिवाला मुकावे लागले. या घटनांचे गांभीर्य बाळासाहेब थोरात किंवा त्यांच्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादी व शिवसेनाला समजलेले नाही, असे म्हणायचे कां?,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
Read Also ;
हाथरस प्रकरणावरून आज काँग्रेसची राज्यात ठिकठिकाणी आंदोलने https://t.co/CfT0dDVVfC @INCMaharashtra @INCMumbai @IYCMaha @INCIndiaLive @bb_thorat @satyajeettambe @sachin_inc @satejp @vishwajeetkadam @atullondhe
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 5, 2020