मुंबई : राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्णांची नोंद होत असल्यामुळे, राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. राज्यात ५ एप्रिपासून नवीन करोना प्रतिबंधक नियमावली लागू केली गेली आहे. परंतु, या नियमावलीमुळे सामान्य जनतेचे जीवनचक्र पुन्हा मंदावले असून, नवीन नियमांना घेऊन, नागरिकांमधून देखील संमिश्र भावना उमटत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच अनेक क्षेत्रांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्यातील करोना परिस्थिती लक्षात घेऊन, राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच नंतर त्यांनी नववी आणि अकरावीच्या विध्यार्थ्यांना देखील अशाचप्रकारे पास करण्याचा निर्णय जाही केला.
या पार्श्वभूमीवर आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भ्रमणध्वनी (फोन)द्वारे संवाद साधून, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंतीवजा मागणी केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासन आणि प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळेच राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या या मागणीला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे ५० हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ५६ हजार २८६ रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.