‘विवाह हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे. या विषयावर निर्बंध आणणारा कायदा असंविधानिक असेल. प्रेमात जिहादची कुठलीही जागा असू शकत नाही’, असं गेहलोत म्हणाले. ‘भाजप देशात अशा प्रकारचं वातावरण तयार करतंय की लोकांना लग्नासाठी सरकारच्या सहानभूतीची आवश्यकता लागेल. भाजपचं हे काम व्यक्ती-स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम आहे’, अशी खरपूस टीका गेहलोत यांनी केली.
‘लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याचा आम्हाला प्रस्ताव मिळाला आहे. लॉ कमिशन आणि याअगोदर इतर राज्यांमध्ये असलेल्या लव्ह जिहादच्या संबंधित कायद्यांचा अभ्यास करुनच पुढील पाऊल टाकलं जाईल. यूपीमध्ये लव्ह-जिहादविरोधात तयार होणारा नवीन कायदा धर्मांतरासंदर्भात बनवलेल्या पूर्वीच्या कायद्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल’, असं उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशमधील कथित लव्ह जिहादच्या वाढत्या केसेसविरोधात लव्ह जिहादच्या कायद्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेश सरकारचा कायदा विभाग यावर काम करत आहे.