मुंबई : करोना सोबत जगताना ‘एसएमएस’ ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. “सध्या आपल्याकडे करोनावर प्रतिबंधक लस नाही. लस येईपर्यंत किती महिने लागतील, सांगता येत नाही. लॉकडाऊन करत राहिलो तर आपल्या अर्थव्यवस्थेचं काय होईल ? ज्यांचं हातावर पोट आहे त्याचं काय होईल ? बिझनेस हाऊसेस, व्यवसाय बंद होतील,” असंही ते म्हणाले. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरोग्यमंत्री बोलत होते.
“ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की हे वर्ष नफा-नुकसानीचा विचार करायचे नाही. हे वर्ष फक्त जगण्यासाठी आपण जगायला हवं. हे करीत असताना आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायजर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅण्डस्.) पद्धतीने जगावे लागेल,” असं टोपे म्हणाले.
‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ सुरू
“राज्यात ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ सुरू आहे त्यामध्ये. १००० रुग्णालये आहेत, ज्यामध्ये आपण १०० टक्के कॅशलेस सेवा, एक रुपया न घेता या सगळ्या सुविधा देऊ शकतो. राज्य सरकारचा एकच फोकस राहिलेला आहे की सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यासमोर आहे, सामान्य गरीब रुग्ण डोळ्यासमोर आहे आणि त्याचे हित आपल्याला कसं जपता येऊ शकेल ते जपण्याच्या दृष्टीकोनातूनची धोरणं आखण्यात आलेली आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
अनावश्यक गोष्टी टाळाव्या
‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ याप्रमाणे सगळ्याच गोष्टींवर मनाचा ब्रेक लावणं गरजेचं आहे. म्हणजेच अनावश्यक ठिकाणी जायचे टाळलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी, कोमॉर्बीड लोकांनी गर्दीत जाणे टाळावे.
शिक्षण सुरू
शाळा सध्या बंद असल्या तरी शिक्षण चालू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट फोन ज्यांच्याकडे आहे ते लोक ऑनलाइन स्कुलिंग करू शकतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाइन स्कूलिंग सर्वत्र अजून चालू नाही. काही अडचणी आहेत. ऑनलाइन स्कूलिंग १०० टक्के परिणामकारक आहे असे मला वाटत नाही आणि हे आपल्याला कायमस्वरूपी ऑनलाइन ठेवता येणार नाही. त्यामुळे लस येईपर्यंत हे असंच सुरू ठेवावं लागणार असल्याचेही ते म्हणाले.