‘सुशांत एक चांगला कलाकार होता, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होतेय, तेवढी दूध प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते,’ अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे .
सुशांतसिंह राजपूत हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता हा तपास सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘राज्यात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही. शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही . एवढेच काय तर अनेक करोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पण एका नटाने आत्महत्या केल्यानंतर एवढी चर्चा होते. तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, आमच्या ऊसाबद्दल, आमच्या जगण्याबद्दल का नाही. लॉकडाऊनमुळे ज्या कामगारांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याबद्दल एवढी चर्चा झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरं वाटलं असतं, . असे शेट्टी म्हणाले आहेत