जळगाव : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला होत असलेल्या विरोधाला प्रादेशिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. हे आंदोलन एकट्या पंजाब किंवा हरियाणाचं नाही तर देशभरातील शेतकऱ्यांचं आहे.
हे दाखवून देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. जळगावमध्ये बुधवारी रात्री स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.
शेगाव-जळगाव रोडवर सावळा फाट्यानजिक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करा, विदर्भात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये मदत द्या, सरकारने पीक विमा कंपन्यांना निर्देश देऊन 100 टक्के पीक विमा मंजूर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.