प्रतिनिधी: विवेक पानमंद
पंढरपूर: मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणुकीदरम्यान राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे या प्रमुख दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार मोहन हळणवर यांनी आक्षेप घेतला आहे. हे दोघे थकबाकीदार असून त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द करावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या उमेदवारीबाबतचा फैसला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. ऍड. अभिमान हाके यांच्यामार्फत हळणवर यांनी अपील केले आहे .
महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या असणाऱ्या दोन्ही उमेदवारांकडे साखर कारखान्याचे अध्यक्षपद आहे. भगिरथ भालके हे पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे, तर समाधान आवताडे हे मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही साखर कारखान्यांनी चालू वर्षी गाळप केलेल्या उसाची एफआरपीची रक्कम दिली नाही. ऊस गाळप झाल्यापासून 14 दिवसांच्या आता एफआरपीची रक्कम संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही एफआरपीची रक्कम दोन्ही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन्ही साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई ( मालमत्ता जप्तीची ) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
साखर कारखान्यांचे अध्यक्ष असलेल्या त्यांच्या दोन्ही कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी आहे. त्यामुळे त्यांचे उमेदवार अर्ज रद्द करावेत, अशी तक्रार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहन ऊर्फ माऊली हळणवर यांनी 31 मार्च रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रार अर्जावर दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजप उमेदवार समाधान आवताडे हे वैयक्तीक थकबाकीदार नसल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज मंजूर केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात तक्रारदार माऊली हळणवर यांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.