अहमदनगर: अहमदनगर शहराचा काल स्थापना दिवस होता. नगर शहराच्या स्थापना दिनीच महानगरपालिकेतील मनपा आरोग्य अधिकारी यांच्या केबिनमध्ये आमदार संग्राम जगताप समर्थकांनी धुडगूस घातला आहे. जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिकेत धुडगुस घालत खुर्च्यांची आदळ आपट केली आहे. एकमेकांवर बाटल्या उगारत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेतून नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली होती, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
जुन्या महानगरपालिकेत काल दुपारच्या सुमारास किरण काळे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील हे मनपा आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत लसीकरणाच्या शहरात चालू असणाऱ्या गोंधळाबाबत चर्चा करत होते. आधीपासूनच आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आमदार जगतापांचा गुंड कार्यकर्ते उपस्थित होते.नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पहिलेच बाचाबाची झाली होती. त्यानंतर जगतापांच्या सांगण्यावरून त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला चढवला.
याला धरा रे, मारा रे अशी अरेरावी सुरु झाली आणि आमदारांनी त्यात तेल ओतायचे काम केले. त्यामुळे गुंड कार्यकर्त्यांनी खुर्च्या तोडून टाकल्या. बाटल्या फोडल्या. मी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना एस. एम. एस करून याठिकाणी पोलीस बळ पाठवण्याची विंनती केली. काही वेळातच पोलीस प्रशासन आल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा नगर शहराच्या स्थापना दिनी गुंड कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती करत शहरात दहशत माजवण्याचा डाव यशस्वी केला असता. या वरून काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.