लातूर : राज्याकडे कोणत्या भागात किती पाऊस झाला हे दर्शवणारे पर्जन्यमानाचे आकडे आहेत, ते गृहित धरूनच आता सरसकट मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. मुंबईत काही तास वीज गेली तर सगळे सरकार धावून गेले. मुंबईची काळजी त्यांनी नक्कीच घ्यावी, पण मुंबईच्या बाहेर उर्वरित महाराष्ट्र आहे, याची देखील आठवण त्यांनी ठेवावी, असा चिमटा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काढला. आता हात जोडून विनंती करतो, शेतकऱ्यांना मदत करा, आम्हाला वेगळा मार्ग निवडायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईत दोन तास वीज गेली तर राज्यभरातील मिडिया आणि राज्य सरकारने त्याची तातडीने दखल घेतली. इकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं, जमीनी वाहून गेल्या तरी त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. जिल्ह्यात ्अजूनही सरकारचा एकही प्रतिनिधी झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आलेला नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आता मुंबईच्या बाहेर पडावे, मुंबई बाहेर उर्वरित महाराष्ट्र आहे याची जाणीव ठेवून त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा करावी, अशी मागणी निलंगेकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. उभी पिकं वाहून गेली, काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या, पावसाच्या पाण्याचे शेतातील माती वाहून नेल्यामुळे पुढील काही वर्ष या शेतात काही पिकेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पंचनाम्याची कारणे देऊन शेतकऱ्यांच्या मदतीला अधिक वेळ करू नका. सरसकट एकरी पन्नास हजारांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांला तातडीने दिलास द्या, असे आवाहन देखील निलंगेकर यांनी केले.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर निलंगेकरांनी राज्य सरकारवर टिका केली. राज्य, मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने आता कितीही मदत केली तरी शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही, अशी परिस्थीती आहे. शेतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे की, सरकारला आता पंचनामे करण्याची देखील गरज नाही.
Read Also
मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या आणि…https://t.co/s0A5YZh3nR#Shivsena #BJP #Uddhavthackarey #Adityathackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020