अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. त्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील हालचालींना वेग आला आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे लिहीत एक ट्विट केले आहे. यामध्ये थेटपणे कोणताही उल्लेख न करता देखील पार्थ यांनी चांगले टायमिंग साधत न्यायालयाचा निकाल येताच ट्विट केल्याचे दिसून आले.
त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे. मात्र पार्थ पवार यांच्या ट्विटबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020
नेमकं काय म्हणाले रोहित पवार
पार्थनं काय ट्विट केले ते माहिती नाही, हे प्रकरण कोर्टात होतं, सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय घेतला आहे. याबाबत पुढे काय भूमिका घ्यायची हा राज्य सरकारचा विषय आहे अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना रोहित यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पार्थ हे पक्षाच्या विपरीत भूमिका मांडताना दिसत आहेत आज पुन्हा एकदा त्यांनी ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पार्थ पवारांची चर्चा सुरु झाली आहे.