अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडत नसल्याने या सरकारला बदनाम करण्यासाठी सुशांतसिंह प्रकरणाचा वापर केला जात आहे, अशी टीका राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून केली आहे.
एखाद्या घटनेचे राजकारण केले जाते तेव्हा ते कोणत्या थरापर्यंत जाईल ते सांगता येत नाही. सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या दुःखद आत्महत्या प्रकरणात नेमके तेच सुरू आहे. राजकीय भांडवलाने टोक गाठले आहे. मुंबईचे पोलीस नीट तपास करणार नाहीत, अशी तक्रार बिहार सरकारची आहे. मुंबई पोलिसांना तपास जमणार नाही. त्यामुळे तो ‘सीबीआय’कडे द्या, अशी मागणी बिहारच्या सरकारने केली व २४ तासांत ती मागणी मान्यदेखील झाली.
केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात उभे राहतात व ‘सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय झाला आहे,’ असे सांगतात. राज्याच्या स्वायत्ततेवर हे सरळ आक्रमण आहे. सुशांत प्रकरण आणखी काही काळ मुंबई पोलिसांच्या हाती राहिले असते तर आभाळ कोसळले नसते, पण एखाद्या विषयाचे राजकीय भांडवल व दाबदबावाचे राजकारण करायचेच म्हटले की, आपल्या देशात काहीही घडू शकेल. सुशांत प्रकरणाची ‘पटकथा’ जणू आधीच लिहिली गेली होती. पडद्यामागे बरेच काही घडले असावे, पण जे घडले त्याचे एका वाक्यात सार सांगावे तर, ‘महाराष्ट्राविरुद्धचे कारस्थान’ असेच सांगावे लागेल.