मुंबई : हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विपृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत, अशी जोरदार टीका शिवसेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे. दसरा मेळाव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाची दखल घेत सामनामधून शिवसेनेने कौतुकाचा वर्षाव केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यास उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत, असे म्हणत राज्यपालांवर देखील शिवसेनेने निशाणा साधला आहे.
हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. सरसंघचालक आणि शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला आणि राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. नागपुरात आणि मुंबईतील वीर सावरकर स्मारक सभागृहात दसऱ्याच्या निमित्ताने हिंदुत्वावर मंथन झाले. दोन्ही नेत्यांचे अभिनंदन!, असे शिवसेनेने म्हटले आहे.
‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात आणि खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे. उद्धव ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत, असेही सामनातून म्हटले आहे.