“राज्य सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने येत्या 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्टपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. या काळात 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात येणार आहे,” अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना दिली आहे.
“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे खोटं बोलत आहे. दूध भुकटी केंद्राने आयात केली नसताना, दूध भुकटी आयात केली, असं खोटं बोलून थोरात दिशाभूल करत आहे,” असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला. “जर दूध भुकटी केंद्राने भुकटी आयात केली असेल, तर त्याचा पुरावा द्यावा,” अशी मागणीही खोत यांनी केली.
“राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. काही दूध संघांचेच दूध खरेदी करत आहे. अशा गोष्टींमुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही,” असेही सदाभाऊ खोत म्हणाले. “तसेच गायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे,” अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.