पुणे : मराठा आरक्षणाचा निर्णय निकाली लागेपर्यंत पोलीस भरतीला स्थिगिती दयावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलिस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने पोलिस भरतीसाठी 12 हजार 538 इतक्या जागांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असं संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने पाठवण्यात आलेल्या निवेदन पत्रामध्ये लिहिले आहे. बहुसंख्य आणि मुख्य समाज असणाऱ्या मराठ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता होणारी पोलिस भरती थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
ही आमची मागणी सरकारने पूर्ण न केल्यास आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करु. त्यानंतर होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास आपले महाविकास आघाडीचे सरकार कारणीभूत ठरेल, असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष सुधीर पुंडे यांनी त्या पत्राव्दारे दिला आहे.