मुंबई : संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या १० मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला. संभाजीराजे छत्रपती हे राजे आहेत. आम्ही प्रजा आहोत. ते कोणालाही भेटू शकतात. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. आता संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं असतं तर ही वेळच आली नसती, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे, असे संभाजीराजे यांनी पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. यावरून विनायक मेटे यांनी निशाना साधला असून पवारांना १० मिनिटे भेटून काहीही साध्य होणार नाही, अशी टीका मेटे यांनी केली आहे.
संभाजीराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट झाली. यावेळी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे मित्र होते. राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉईंट असल्याचं संभाजीराजे म्हणाले. तसंच उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.