राज्यातील मंदिरे खुली करावीत यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरापाशी आंदोलन करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिर परिसरात वंचितचे कार्यकर्ते आणि वारकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
संजय राजऊ म्हणाले की, ‘पंढरपूरला प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे, हे चित्र सकरात्मक आणि चांगले नाही. आंबेडकर हे संयमी नेते आहेत. ते कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून या परिस्थितीमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची किंवा नियमभंगाची भाषा करणे म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखे आहे.’
‘पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी फक्त तिथे जमलेले आंदोलकच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आसूसलेला आहे. पण सोशल डिस्टन्सिंग हा कोरोना काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आंदोलनावेळी हजारो लेक जमल्यामुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. मंदिर बंद ठेवणे हे कोणी आनंदाने करत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकार हे टप्प्याटप्याने अनेक गोष्टी सुरू करत आहे. लवकरच मंदिरांचा विचार करण्यात येईल. आज ज्याप्रकारने पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांनी गर्दी जमवली आहे याबाबत संजय राऊत यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
राऊत पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांसारख्या प्रमुख नेत्याच्या मागे अख्खा समाज आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी किंवा गृहमंत्र्यांशी चर्चा करावी. पण अशाप्रकारे विठ्ठल मंदिराच्या बाहेर लोकांना वेठीस धरू नये. तसेच महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारताना दिसत आहे कोरोनासंदर्भात त्यात पुन्हा तणाव निर्माण करू नये’, असेही संजय राऊत म्हणाले.