मुंबई : संपूर्ण शासन फक्त बदल्यांच्या मागे लागलं आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे.अशा प्रकारची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकार बदलल्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असं घटनेत लिहिले आहे का ? असा सवाल विरोधी पक्षाला विचारला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी विरोधकांच्या अनेक आरोपांचा समाचार घेतला. अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे हा एक सरकारी प्रक्रियेचा भाग आहे असे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच शासनाने केलेल्या या बदल्या जनतेच्या हिताच्या असल्याचे देखील राऊत यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस बदल्यांबाबत
बदल्या महत्त्वाच्या आहेत पण एखाद्या वर्षी नाही केल्या म्हणून काही फरक पडत नाही. बदल्यांचा एका वर्षाचा खर्च ५०० कोटींच्या घरात जातो. करोना संकट असताना या बदल्या केल्या नसत्या तरी चाललं असतं. पण मंत्री, प्रशासन सगळेजण कोणाला कशी पोस्टिंग मिळणार, कुठे बदली होणार यात गुंग आहेत, संपूर्ण शासन फक्त बदल्यांच्या मागे लागलं आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे.अशा प्रकारची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.