मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये ट्विटरवर चांगलेच वाकयुद्ध रंगल्याचे पहायला मिळाले. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुनच शिवसेनेने आता केंद्रावर निशाणा साधत महाराष्ट्र सरकारला विरोध करण्यासाठी केंद्र अंडर वर्ल्ड डॉन डाऊद इब्राहिमलाही वाय दर्जाची सुरक्षा देईल असं म्हटलं आहे.
अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र सरकारला विरोध करण्यासाठी केंद्र सरकार हे सर्व करत असल्याचं म्हटलं आहे. “उद्या महाराष्ट्र सरकारने किंवा एखाद्या मंत्र्याने दाऊदविरोधात वक्तव्य केलं तर केंद्र सरकार दाऊदलाही एक्स किंवा वाय दर्जाची सुरक्षा देईल. महाराष्ट्र सरकारला विरोध करणं एवढंच त्यांच धोरण आहे,” अशा शब्दांमध्ये सरनाईक यांनी कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला.
आज मुंबईमध्ये अनेक पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तरीही ते आपल्या कर्तव्य पार पाडत आहेत. असं असतानाही त्यांच्यावर विश्वास नाही असं म्हटलं जात असेल तर ते योग्य नाही, असं मतही सरनाईक यांनी व्यक्त केलं.
“महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारला खूपच प्रेम असल्याचे दिसून येत आहे. महिला आयोगाला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटनांची दखल घेता येत नाही,” असा टोलाही सरनाईक यांनी लगावला.
मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या कंगनाविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे सरनाईक यांनी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर अध्यक्षांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबत २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून 24 तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. pic.twitter.com/CGfrQM0E5H
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 7, 2020