सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून 1 वर्ष झाली आहेत. आता काँग्रेस नेतेच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसचे अध्यक्ष करावे अशी मागणी करत आहेत. सोनिया गांधी यांना काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. त्यात महाराष्ट्रातील मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. मात्र आता यावरून महाराष्ट्रातील दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.
गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका सुनिल केदार यांनी केली आहे.
Move in state freely. Congress can give fight to BJP govt only when party has gandhi as it's head. This is high time to stand firmly behind Sonia ji's leadership.@SoniaGandhi_FC @RahulGandhi @priyankagandhi
— Sunil Chattrapal Kedar (@SunilKedar1111) August 23, 2020
सुनिल केदार यांनी ट्विट केले की, माझा काँग्रेस अध्यक्षा म्हणून सोनिया गांधींनी पुर्ण पाठिंबा आहे. गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी तातडीने या बद्दल सोनिया गांधींची माफी मागितली पाहिजे. अन्यथा हे नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे.
केदार यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवरच सार्वजनिकरित्या टीका केल्याने महाराष्ट्र काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे.