राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ६ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट देण्यासाठी गेले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील अंतर्गत गैरसमज दूर करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले होते या भेटीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील टीका केली होती.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कसं चालेल?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. ते काल पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच पाटील यांनी “शरद पवार यांनी या वयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही.” अशा शब्दात पवारांना देखील टोला लगावला होता. त्यावर शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.
“मातोश्रीवर गेल्याने कमीपणा वाटत नाही. चंद्रकांत पाटील यांना चिंता असेल, मात्र मला त्यावर भाष्य करायचं नाही” अशा शब्दात पवारांनी पाटलांना प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले,” “महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं म्हणत आहेत, मात्र तसं काही नाही. राज्यातील समस्यांवर आम्ही चर्चा करतो. माझी मुलाखत संजय राऊत घेत असल्यामुळे मला जवळचं ठिकाण म्हणून मी ‘मातोश्री’वर गेलो होतो. मातोश्रीवर गेल्याने कमीपणा वाटत नाही. चंद्रकांत पाटील यांना चिंता असेल, मात्र मला त्यावर भाष्य करायचं नाही” असं शरद पवार म्हणाले होते.
विरोधकांचं टीका करण्याचं काम आहे, मुख्यमंत्र्यांचं काम दिसत आहे, मात्र कोरोनामुळे प्राधान्य बदलले आहे, 14 ते पंधरा तास बैठक होतात, यावेळी टीका करु नये, बदलीबाबतचा काही मुद्दा नाही. पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असंही शरद पवार म्हणाले होते.