सत्तेसाठी हिंदुत्व सोडून ज्या पक्षांशी कधीच विचार जुळले नाही त्यांच्या सोबत सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. राज्यात कुठेही शिवसेनेने रामाचे पुजन केले याचे फोटो दाखवा असे आव्हान करतांनाच शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी असून त्यांना भाजपचे हिंदुत्व नको आहे, असा आरोपही भाजपचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी केला.
अयोध्येत राम मंदिराच्या भुमीपूजनाचा सोहळा पार पडत असताना राज्याभरासह औरंगाबादेत भाजपच्या वतीने ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजून करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी रामाचे पुजन व जल्लोष करण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर उत्सव साजरा करणाऱ्या अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा स्वर उमटल्याचे पहायला मिळाले.
कुठे बाबरी मशीद पाडल्यानंतर ही माझ्या शिवसैनिकांनी पाडली आहे, मला त्याचा अभिमान आहे असे छातीठोकपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि कुठे रामाचे पुजन केले म्हणून हिंदुत्ववादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे खरे होते, तर उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी आहे. शिवसेनेला भाजपचे हिंदुत्व नकोय, म्हणूनच राज्यात अशा प्रकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
संपुर्ण देश जेव्हा आपापल्या भागात रामाचे पुजन करून राम मंदिर निर्माणाच्या भुमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा करत होता. पण शिवसेनेच्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना आपल्या घरातही पूजन करता आले नाही. उलट आम्ही रस्त्यावर उतरून रामाचे पूजन केले, लाखो लोकांच्या भावनांचा सन्मान केला तर आमच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनीच पोलिसांना फोन करून गुन्हे दाखल करायला लावले असा थेट आरोप देखील यावेळी संजय केणेकर यांनी केला.