पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर तेथे निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या घोषणा करण्यात आली आहे. तिथून भारत भालके यांचे चिरंजीव भागीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीकडून भागीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे मित्र पक्षातील उमेदवारांनी पण बंडखोरी केली आहे. शिवसेनेने आघाडीचा धर्मपाळत बंडखोर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख शैला गोडसे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
स्व. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे होणारी पोटनिवडणूक जर सर्वांच्या मते बिनविरोध होत असेल तर स्वागत आहे. परंतु, जर निवडणूक लागणार असेल तर या निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहोत, असा दावा शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी केला होता.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेना पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षाच्या सामना वृत्तपत्रातून यासंदर्भातील घोषणा केली आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र, भाजप शिवसेना युतीमुळे हि जागा रयत क्रांती मित्रपक्षाला देण्यात आली होती त्यामुळे त्यांनी माघार घेतली होती. आता पोटनिवडणुकी रणधुमाळी सुरू असतानाच त्यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे. शैला यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे पहिले पाऊल टाकले आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाडीवस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षांपासून मी काम करीत असून गेल्यावेळी उमेदवारी डावलल्यावरही मी पक्षादेश मनाला होता. यंदा देखील शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष या दोघांचीही भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना महाविकास आघाडीत असल्यामुळे पक्षाचा अधिकार आहे. पक्षाच्या विरोधात आपण बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी जनता आणि कार्यकर्ते यांचा आग्रह असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पंढरपूर पोटनिवडणूक आता दुरंगी न होता बहुरंगी होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.