नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नागपूर जिल्ह्यात एकटी पडली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सेनेने प्रस्ताव दिला होता. मात्र, अद्याप उत्तर आले नसल्याने आता शिवसेनेने एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यास नेत्यांनी अधिकृत दुजोरा दिला नाही.
जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या सात आणि राष्ट्रवादीच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत. याशिवाय भाजपच्या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत वापरण्यात आलेला फॉर्म्युला कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसने घेतला आहे.
राज्यात महाविकास आघाडी असल्याने पोटनिवडणुकीतही ती कायम ठेवावी, अशी मागणी शिवसेनेची आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे फक्त दोनच सदस्य निवडणूक आले आहेत. त्यांच्या एकाही सदस्यांचे सदस्यत्व गेलेले नाही. पोटनिवडणुकीत सोबत घेतल्यास काही जागा सेनेला सोडाव्या लागतील. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. याच कारणाने राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला अद्याप होकार दिला नाही.
शिवसेनेने स्वंत्रपणे लढावे
रामटेक, नरखेड तालुक्यातील काही पॉकेट्स शिवसेनेचे आहेत. त्याव्यतिरिक्त जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नाही. शिवसेना स्वतंत्रपणे सर्व जागांवर लढल्यास त्याचा फटका भाजपला अधिक बसण्याची शक्यता आहे. हा विचार करून शिवसेनेने स्वतंत्रपणे लढावे, असे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा असल्याचे समजते.
UDD