रत्नागिरी : संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा त्याला पाठिंबा दिला गेला. त्यानंतर भूमिका कशी बदलते? काही पक्ष तटस्थ राहिले ते पक्ष आज विरोध कसा करु शकतात? असा सवाल करत भाजप नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “आधीच्या सरकारमध्ये कायदा मांडताना काही लोकं सरकारमध्ये होते. मात्र, आज ते विरोध कसे करतात? असा जर विरोध असेल आणि त्यासाठी भारत बंदला पाठिंबा असेल तर या मुद्यावरून राजकारण केलं जातंय”, असं तावडे म्हणाले.
शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. याबाबत विनोद तावडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अकाली दल आणि शिवसेनेवर टीका केली. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं आणि उद्धव ठाकरेंना भेटले होते, अगदी तशाच प्रकारची ही भेट आहे. विरोधी पक्षाला मोदी सरकारला विरोधी करायला संधी मिळत नाही. एखादी संधी आली तर त्यात आपल्याला कसं जाता येईल हे पहाण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र जनता जनार्दन फायनल आहेत. शेवटी काय करायचं ते जनता ठरवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या या दाव्यात तथ्य नसल्याचं तावडे म्हणाले. गेहलोत यांचा हा गौप्यस्फोट नाही. गौप्यस्फोट करण्यासाठी पुरावे लागतात. राजकीय नेते आणि विरोधक अशी वक्तव्ये करत असतात, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
दरम्यान, भाजप आणि मनसेची युती होईल का? या प्रश्नावर विनोद तावडेंनी मौन पाळलं. त्यासाठी अजून भरपूर वेळ अल्याचं सांगत त्यांनी प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. घटनेप्रमाणे केंद्राने केलेला कायदा राज्याला लागू असतो. राज्याला त्यापेक्षा कडक करायचा असेल तर राज्य सरकार कायदा बदलू शकतं. हे अधिकार घटनेने नेमून दिलेले अधिकारी आहेत. कायद्यात बदल करायचे असतील तर राष्ट्रपतींची अनुमती मिळते, असं तावडे म्हणाले.
राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यावरदेखील तावडेंनी प्रतिक्रिया दिली. पराभव एक झाला तरी सर्वच संपले किंवा त्यांच्या बाजूनी सर्व आहे असं नाही. थोडंफार मागे-पुढे होतं. याशिवाय त्यातून नवीन गोष्टी चांगल्या पद्धतीने उभ्या राहतील. महाविकास आघाडीची तीन पक्षांची ताकदीचाअंदाज चुकला हे फडणवीसांचे म्हणणे बरोबर आहे, असं विनोद तावडे म्हणाले.
Read Also :
कृषी क्षेत्रासंबंधी शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रावर संजय राऊतांचं भाष्य, म्हणाले…
भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं शेतकरी प्रेम नकली – भाजपा
…तर चर्चा करू, फडणवीसांच्या विधानावर मनसे नेत्याचं वक्तव्य
‘आता तुम्ही हिमालयात जाणार का?’ पत्रकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं मौन