राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र अजूनही या महविकासआघाडीत काही ठिकाणी बिघाडी असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीने पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले होते. शेवटी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढावी लागली होती. तसेच त्यांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवू नये, असे सांगितले होते. मात्र, नुकताच कुणकेश्वर येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यामध्ये राष्ट्रवादी पक्षातील काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला
आपला पक्ष वाढवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत असल्यास त्याला काहीही हरकत नाही. मात्र राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत असताना मित्रपक्षाचेच कार्यकर्ते फोडण्यात कसली आघाडी? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवू नये, असे यापूर्वी सांगितले आहे. परंतु कुणकेश्वर येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शिवसेनेने याला हरताळ फासल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे येथील ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी व्यक्त केली. याकडे अजित पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
घाटे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यानंतर राज्यात आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करण्यावरून मतभेद दिसून आले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यापुढे मित्रपक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र असे असताना तालुक्यातील कुणकेश्वर येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यामध्ये राष्ट्रवादी पक्षातील काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला ही बाब अत्यंत संतापजनक आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांच्या सूचनांना हरताळ फासण्याचा प्रकार आहे.