मुंबई : . मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांशी चर्चा करुन उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ते उत्तर प्रदेशात मुंबईसारखी फिल्मसिटी बनवण्यावर अधिक जोर देत आहेत. मुंबईतली मायानगरी यूपीला हलवण्याचा योगी आदित्यनाथांचा प्रयत्न असल्याचा दावा करत शिवसेनेने योगींना लक्ष्य केले आहे.
‘उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल’, असा खोचक सल्ला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून योगींना देण्यात आला आहे.योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली.
भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.