माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी ‘नाणार’ प्रकल्पाबाबत शिवसेनेवर टीका केली होती. ‘पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही.’ असा आरोप नायन राणे यांनी केला होता.
नारायण राणे यांच्या या आरोपावर शिवसेनेचे तडाखेबाज नेते गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे “नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत” अशा शब्दात त्यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.
“नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते.” असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला.
“नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. ते जर असे काही बोलले नाहीत, तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही” असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी राणेंना काढला.